वाहतूक शाखेकडून एपीएमसीत वाहतूक कोंडी करणाऱ्या १५० वाहनांवर कारवाई

  • Admin
  • नवी मुंबई
  • Nov 26, 2025

अरुण गुप्ता

नवी मुंबई – एपीएमसी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एपीएमसी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या १५० वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिली.

मोहीमेदरम्यान प्रलंबित दंड असलेल्या एका वाहनचालकावर विशेष कारवाई करत त्याच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 एपीएमसी परिसरातील कोंडीचे कारण

एपीएमसी वाहतूक शाखेच्या कार्यक्षेत्रात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची पाच मोठी मार्केट्स येतात. त्यामुळे दररोज शेकडो रिक्षा, ट्रक, टेम्पो आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते.

मसाला मार्केट ते माथाडी भवन ,माथाडी भवन ते फळ मार्केट या मार्गांवर रिक्षा व इतर वाहनचालकांनी अयोग्य पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी केल्याने गंभीर वाहतूक कोंडी होत होती. दोन मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा ५ ते ७ मिनिटे लागायची. याचा मोठ्या प्रमाणात त्रास व्यापार्‍यांना आणि ग्राहकांना सहन करावा लागत होता.

व्यापाऱ्यांनी केली तक्रार

घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाने पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती की सकाळच्या गर्दीत रिक्षा चालकांमुळे भाजीपाला मार्केटसमोर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तक्रारीची दखल घेत पोलीसांनी नियमित कारवाई सुरू केली.

 कारवाईनंतर बदल

नियमित पोलिस कारवाईमुळे वाहतूक कोंडीमध्ये लक्षणीय घट झाली. त्यामुळे व्यापारी वर्ग समाधानी असून, त्यांनी संघटनेतर्फे पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांचा सन्मान केला.कारवाईसोबतच जमलेल्या नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनही करण्यात आले.